पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्यापासून सुरू असलेले युद्ध… सगळे खाद्यपदार्थ संपलेले… भुकेने व्याकुळ होणारा जीव… अशा अवस्थेत मंगळवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला… किराणा दुकानासमोर दोन तास रांगेत उभा राहिला… पण त्याला खाद्यपदार्थ मिळण्याआधीच तो रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबाराचा शिकार ठरला… (नवीन शेखरप्पा)
कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातील चळगेरी गावच्या नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (वय 20) या विद्यार्थ्याची ही करुण कहानी. (Ukraine) या युद्धात मारला गेलेला तो पहिला भारतीय. तो युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी रशियन सैनिकांनी खार्किव्हमधील गव्हर्नर इमारतीनजीक गोळीबार केला. यात नवीनचा मृत्यू झाला. त्यांच्या वडीलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नवीनचे वडील शेखरप्पा ग्यानगौडर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मुलगा नवीन मोठा होईल यासाठी मोठे स्वप्न पाहत होतो. आमचे स्वप्न अधुरेच राहिले. मी माझ्या मुलाला एमबीबीएस शिकण्यासाठी मजबुरीने युक्रेनला पाठवले होते, कारण एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत टॉपर असूनही त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळू शकली नाही.
गेल्या आठवड्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर नवीनने एका बंकरमध्ये आश्रय घेतला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नवीन दिवसातून पाच ते सहा वेळा फोन करून आपण सुरक्षीत असल्याची माहिती द्यायचा.
युक्रेनमध्ये मुलाचा स्फोटात मृत्यू झाल्याने ग्यानगौडर यांना मोठा धक्का बसला आहे. ते म्हणाले, आपल्या देशात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्यासाठी ८५ लाख ते एक कोटी रुपये खर्च करावे लागले असते. यामुळे मी त्याला युक्रेनला अभ्यासासाठी पाठवायचे ठरवले. हाच निर्णय मला अधिक महागडा पडल्याचे ते म्हणाले.
शेखरप्पा ग्यानगौडर यांनी आपला मुलगा युक्रेनला पाठवण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'शिक्षण व्यवस्था आणि जातीवादामुळे आश्वासने देऊनही नवीनला जागा मिळू शकली नाही. मी आपली राजकीय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि जातिवादामुळे निराश झालो आहे. सर्व काही खाजगी संस्थांच्या हातात आहे. अशी त्यांनी खंत व्यक्त केली.