कराड ः पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारसह राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी रोज राजकीय भोेंगे सुरू असतात, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याचबरोबर हमीभाव गॅरंटी कायदा व्हावा, यासाठी देशभरातील शेतकर्यांसह राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
राजू शेट्टी यांनी कराडमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्यस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 1 मे रोजी होणार्या प्रत्येक गावच्या ग्रामसभेत शेतकर्यांना दिवसा 10 तास शेतीसाठी वीज मिळावी तसेच हमीभाव गॅरंटी कायदा करण्यात यावा, यासाठी ठराव करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक गावांचे याबाबतचे ठराव आम्हाला प्राप्त झाले आहेत.
शेतकर्यांना दिवसा वीज मिळणे हा मुलभूत हक्क आहे. रात्रीच्या वेळी वीज मिळाल्याने जीव धोक्यात घालून शेतकर्यांना शेतात जावे लागते. मागील पाच वर्षात वन्य प्राण्यांचा हल्ला, संर्प दंश यासह विजेचा शॉक लागून अनेक शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व माहिती एकत्रित करण्याची कार्यवाही आमच्याकडून सुरू आहे. ही सर्व माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे.रात्री वीज पुरवठा करून शेतकर्यांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. 16 एप्रिलपासून देवराष्ट्रे येथून बळीराजा हुकांर यात्रा सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
देशाचे कृषी मंत्री नाबार्डचे प्रमुख असतात. साखर कारखाने वगळता प्रक्रिया उद्योगांना नाबार्डकडून रिफायनान्स केला जातो. साखर कारखाने मात्र जिल्हा बँक अथवा राज्य बँकेंकडून साखर पोत्यावर कर्ज घेऊन शेतकर्यांना दर देतात. त्यामुळे व्याजाचा बोजा कारखान्यांवर पडतो. दरवर्षी 30 हजार कोटी साखर तारण कर्ज घेतले जाते आणि त्यातून जिल्हा बँक व राज्य बँकेंस 2 हजार कोटींचे व्याज मिळते. राजकीय बगलबच्चे पोसण्यासाठी असे केले जात आहे. खासदार शरद पवार हे 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेणे सहजशक्य होते. मात्र त्यांनी तो घेतला नाही असे सांगत शरद पवार यांचे शेती विषयक धोरण चुकीचे असल्याचे आपण म्हटले होते असेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.