पुढारी ऑनलाईन डेस्क : sourav ganguly : आयपीएलच्या 15व्या सीझनची धूम जगभर सुरू आहे, त्यामुळे क्रिकेट चाहते आणि खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे, त्यात मुंबईसारखा संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. या हंगामात भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांच्या बॅटमधून धावाच येत नसल्याचे चित्र आहे. अशात त्यांच्यावर अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी टीका केली आहे. तर अनेकांनी दोघांवर विश्वस ठेवा ते धावा काढतील असे म्हटले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित आणि विराट हे दोन्ही फलंदाज एकही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले आहेत. दोन्ही खेळाडूंना खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी दोन्ही खेळाडूंचा बचाव करताना त्यांच्या खराब फॉर्मवर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, या दोन खेळाडूंच्या फॉर्मबद्दल काळजी करण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे विश्वचषक अजून दूर आहे आणि तोपर्यंत हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये परत येऊ शकतात.
आयपीएलच्या या हंगामात विराट कोहलीने 13 सामन्यांमध्ये केवळ 236 धावा केल्या आहेत, तर त्याची सरासरी 19.67 आणि स्ट्राइक रेट 113.46 आहे. या मोसमात त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे, तर तो तीनदा गोल्डन डकचा बळी गेला आहे. (sourav ganguly)
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर त्याची अवस्थाही अशीच आहे. 12 सामन्यांत तो 18.17 च्या सरासरीने आणि 125.29 च्या स्ट्राईक रेटने केवळ 218 धावा करू शकला आहे. यादरम्यान तो एकदा शून्यावर बाद झाला, तर पाच वेळा त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. रोहितला या मोसमात एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही. (sourav ganguly)
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली. रोहित आणि विराटच्या खराब फॉर्मची मला अजिबात चिंता नाही, असं गांगुली म्हणाले. दोघे खूप चांगले खेळाडू आहेत, असे त्यांनी सांगितले. विश्वचषक अजून दूर आहे आणि मला खात्री आहे की हे खेळाडू स्पर्धेपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये असतील. आयपीएलनंतर भारतीय संघाला अनेक टी-20 मालिका खेळायच्या आहेत आणि त्यानंतर या खेळाडूंना पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.