पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकांवर आज (दि.१४) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये अत्यंत घटनाबाह्य सरकार काम करत आहे. बेकायदेशीर सरकार आहे. एक फुल दोन हाफ सरकारने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली."
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या याचिकांवर सुनावणी आज (दि.१४) घेण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. त्यासाठी पुरेशा, योग्य कालावधीत निर्णय घेण्यासही बजावले होते. या निकालाच्या पाच महिन्यांनंतर विधानसभा अध्यक्षांकडे आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होत आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सरकार होत. शिवसेनेमध्ये फुट पाडून सरकार पाडलं, मुख्यमंत्र्यासह आधी १६ आणि नंतर उरलेले अपात्र होते. अशा प्रकारची ही केस आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक राष्ट्रवादीमधून फोडण्यात आले. त्या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांच्यासह ज्यांनी शपथ घेतली ते ९ आमदार अपात्र ठरले. हे आम्ही सांगत नाही तर देशाची घटना सांगत आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत सांगितल आहे. तरीही विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना अनेक पक्ष बदलण्याचा अनुभव आहे. पक्षांतर हा त्यांचा धर्म आहे, असे पीठासन अधिकारी चालढकल करत आहेत. ते स्वत: कायद्याचे जाणकार आहे. खरतर त्यांनी कायद्याशी, घटनेशी देशद्रोह केला आहे असे मी मानतो.
संजय राऊत म्हणाले की, एक वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार बसले. त्यांनी घटनाबाह्य निर्णय घेतले आहेत. या सरकारने घेतलेल्या निर्णयातून भ्रष्टाचार झालेला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. तरीही सरकार आदेश मानायला तयार नसतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महाराष्ट्राचे सुपुत्र ज्यांनी घटनेवर काम केले ते अस्वस्थ झाले असतील. त्यांना घटनेचे आदेश पाळण्याची सुबुद्धी येवो" असेही ते म्हणाले.
हेही वाचा :