पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये सलामीवीर इशान किशनने सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवत व्दिशतक झळकावले. त्याच्या या खेळीने अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. त्याचबरोबर आगामी काळात सलामीवीर शिखर धवन यांचेही संघातील स्थान धोक्यात आले असल्याचे मानले जात आहे. ( Ishan vs Shikhar ) शिखर धवनच्या वनडे संघातील सहभागाबाबत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) नवीन निवड समितीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
शिखर धवन हा मागील ९ वनडे सामन्यात आठवेळा अपयशी ठरला आहे. त्याच्या खेळीमुळे पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाची चाचपडत सुरुवात होते. रोहित शर्मा स्वतःचा आक्रमक खेळ करू शकतो. मात्र शिखर धवन हा नेहमी सावध सूरुवात करतो. फक्त मधल्या षटकांमध्ये वेग वाढवतो आणि वापरलेल्या डॉट बॉलची तो भरपाई करतो. मात्र त्याची ही शैली भारताला त्रासदायक ठरत आहे. आता बीसीसीआय एकूणच संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा आढावा घेणार आहे. याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि 'एनसीए' प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती 'बीसीसीआय'च्या एका वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'पीटीआय' दिली.
ऑस्ट्रेलियातील टी-२०विश्वचषक स्पर्धेवेळी 'पीटीआय'ने आपल्या वृत्तात म्हटलं होते की, "संघातील वरिष्ठ खेळाडूंना
टप्प्याटप्प्याने संघातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल. नवी निवड समिती ही शिखरच्या भवितव्याबाबत निर्णय घेईल. त्याचबरोबर याबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मताचाही विचार होईल"
बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यामध्ये इशान किशन याने द्विशतक झळकावत सर्वांना प्रभावित केले आहे. २०२३ मध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्याही नावाचा आता विचार होवू शकतो. मात्र रोहित आणि विराटनंतर तिसर्या क्रमांच्या धावा नावावर असणारा शिखर धवन याला संघातून वगळणे सोपे असणार नाही. जानेवारीत श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत धवनला संधी द्यावी, अशीही चर्चा सुरु असल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले. मात्र या मालिकेत तो अपयशी ठरल्याचा त्यांचा विश्वचषक स्पर्धेतील संघात स्थान मिळणे कठीण होणार आहे.
शिखर धवन वन डे सामन्यांव्यतिरिक्त अन्य कोणताही फॉरमॅट खेळत नाही.देशांतर्गत T20 (सय्यद मुश्ताक आय ट्रॉफी) आणि दोन 50 षटकांचे सामने (विजय हजारे) खेळले आहेत. धवनने गेल्या चार वर्षांपासून एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. त्यामुळे शिखरला संघात स्थान मिळणार का, या प्रश्नावर आता तरी होकारर्थी उत्तर मिळताना दिसत नाही.
3 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या २९ दिवसांच्या कालावधीत भारतीय संघ 12 सामने खेळणार आहे. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा आणि श्रीलंकेविरुद्ध सहा वनडे सामन्यांचा समावेश आहे. या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणार्या खेळाडूंचाच विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात समावेश होणार आहे.
हेही वाचा :