जेवणानंतरच्या शतपावलीने ‘या’ आजाराचा घटतो धोका
लंडन : जेवणावर आडवा हात मारून लगेच आडवे होणारे म्हणजेच वामकुक्षी करणारे अनेक असतात. मात्र, जेवल्यानंतर शतपावली करणारे किती आहेत? जेवून झाल्यावर काही वेळ फेर्या मारण्याची परंपरा जुन्या काळापासूनच आपल्याकडे आहे. ही शतपावली आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते. आताही एका नव्या संशोधनात आढळले आहे की जेवल्यानंतर केवळ दोन मिनिटे चालणेही टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करते.
जेवल्यानंतर लगेचच बसणे, झोपणे यामुळे लठ्ठपणा वाढतो. याचे कारण म्हणजे या कृतींचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होत असतो. त्यामुळे जेवल्यानंतर दोन मिनिटे का होईना चालणे हितावह ठरते. किमान शंभर पावले चालावीत, पंधरा मिनिटे तरी चालावे असे आपल्याकडे पूर्वीपासून म्हटले जाते.
'जर्नल ऑफ स्पोर्टस् मेडिसिन'मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणात सात रिसर्चमधून आढळून आले की जेवणानंतर फक्त दोन मिनिटे चालणे टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करू शकते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते. जेवल्यानंतर बसून राहणे किंवा झोपणे आणि चालणे यावरून रक्तातील साखरचे प्रमाण व इन्शुलिन याबाबत तुलना करण्यात आली. जेवल्यानंतर लगेच झोपणार्यांची साखरेची पातळी अचानक वाढली, जी हळूहळू कमी होत गेली.
संशोधनानुसार पंधरा मिनिटे चालणे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या समस्यांमध्ये लाभदायक ठरू शकते. जेवण झाल्यानंतर 60 ते 90 मिनिटांच्या आत थोडे चालणे आवश्यक सअते. ह्यूस्टन मेथोडिस्ट रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. केरशॉ पटेल यांनी म्हटले आहे की आरोग्यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीचे फायदे आहेत, जरी ते लहानसे पाऊल असले तरी!