नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
शरद पवार हे कार्पोरेट शेतकरी आहेत, त्यांचे विचारही कार्पोरेट आहेत. त्यामुळे त्यांनी मोदी सरकारच्या शेती कायद्यांना अडथळे आणले अशी टीका एसटी कष्टकरी जनसंघ संस्थापक गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ते नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते.
शरद पवार यांच्यावर यावेळी त्यांनी चांगलाच निशाणा साधला. शेती कायद्याच्या संदर्भात आम्ही सूक्ष्मपणे पाहात होतो, की नेमकं काय सुरु आहे. त्यात कृषी विद्यापीठाचे संशोधक, विद्यार्थी प्राध्यापक होते. तिथे आम्हाला असे पाहायला मिळाले की, नरेंद्र मोदी यांनी कायदे आणले त्यात शेतकऱ्यांची सुरक्षितता होती. शेतक-यांना दुष्काळ आणि नैसर्गिक संकटात मदत झाली असती. तशी हमी त्या कायद्यामध्ये होती. परंतु सामन्य अल्पभूधारक शेतक-यांना मोबदला मिळत गेला तर आपल्याला नोक-याच राहणार नाहीत. अशा अशुद्ध हेतुने शरद पवार यांच्या सारख्या कॉर्पोरेट शेतक-यांनी त्या कायद्यांना अडथळे आणले. शरद पवार हे कार्पोरेट शेतकरी आहेत, ते कार्पोरेट विचार करतात अशी टीका सदावर्ते यांनी यावेळी केली.
सदावर्ते यांनी प्रसंगी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. जे हल्ल्याची भाषा करतात त्यांना आम्ही टोळके समजतो. शरद पवार यांच्या काळातच दाऊद ईब्राम्हिम वाढलेला आहे. तसेच नथुराम आणि बाबासाहेब यांची भूमिका ही अखंड भारताची भूमिका आहे. मात्र, काँग्रेस ने गलीच्छ राजकारण केले आहे असे सदावर्ते म्हणाले. इतिहासाच्या बाबतीत येणाऱ्या काळात अनेक सत्य गोष्टी बाहेर आणाव्या लागतील. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हढा अभ्यास केला आहे. त्यानुसार एम के गांधी यांनी कधी टोपी घातली नाही. परंतु सोयीप्रमाणे इतिहास रचला गेल्याचे सदावर्ते म्हणाले.