![Sharad Pawar](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2FUntitled-design-63-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित 'स्वाभिमान सभा' झाली. या सभेला शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला संघटना राज्यप्रमुख ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत असताना शरद पवार यांनी एक आठवण सांगितली आहे. (Sharad Pawar)
शऱद पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,
"आजचा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. काही नवीन प्रश्न निर्माण झालेत त्यासाठी राज्य सरकारला विश्वासात घेऊन बैठक करावी लागेल आणि स्थानिक लोकांच्या जमिनी वाचतील कशा, भूमिपुत्रांना उध्वस्त करणारे काही प्रकल्प यामधून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करावा लागेल; या सर्व भागांमध्ये राज्याच्या भल्यासाठी उन्हा-तान्हाचा विचार न करता घाम करणारा जो माथाडी कामगार आहे त्यांना घरं दिली पण, त्या घराची आजची अवस्था ही बघितल्यानंतर इथे अधिक काहीतरी काम करण्याची गरज आहे, याची खात्री ही आपल्या सगळ्यांना आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत, या गोष्टीचा विचार आजच्या या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात मांडला.
प्रकल्प आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो पण, स्थानिक लोकांना उध्वस्त करून विकास ही जी संकल्पना पूर्ण करायची असेल तर ती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊ इच्छितो की, देशाचे पार्लमेंटचे अधिवेशन चालू आहे ते १० दिवसात संपेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या नयना प्रकल्पासाठी जी काही तुमची मागणी असेल त्याची पूर्तता करायला जी काही आवश्यकता असेल त्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्या बरोबर आहोत, हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. काही करायची गरज नाही; हा विकास याचा अर्थ स्थानिक माणूस उध्वस्त नव्हे, हा विकास याचा अर्थ स्थानिक माणसाच्या संसारामध्ये सुधारणा झाली ही स्थिती आज आपल्या सगळ्यांना निर्माण करायची आहे.