![मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते परंतु देशाच्या पंतप्रधानांना तिथे भेट द्यावीशी वाटत नाही : शरद पवार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2FSharad-Pawar.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बीड, पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील सत्तेच्या जोरावर लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. हे अति होत असल्याने जनताच त्यांना आता उलथवून टाकेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
गुरुवारी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत खा. पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. अनिल देशमुख, आ. संदीप क्षीरसागर, आ. रोहित पवार, मेहबूब शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बीड शहराबाहेरून भव्य अशा मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून खा. शरद पवार हे सभास्थळी पोहोचले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजीत त्यांचे स्वागत केले.
मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते, घरादारावर पेट्रोल टाकले जाते, परंतु देशाच्या पंतप्रधानांना तिथे भेट द्यावीशी वाटत नाही. लोकसभेत या प्रश्नावर चर्चा होत असताना ते केवळ चार ते पाच मिनिटे यावर बोलतात, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. देशाच्या सीमा भागातील राज्यांमध्ये अशांतता आहे. ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगली बाब नाही. अशा स्थितीमुळे देशाच्या सैन्य दलाला अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. भाजपकडून स्थिर सरकारचा वारंवार उल्लेख केला जातो, परंतु लोकांनी निवडून दिलेले गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील सरकार भाजपनेच पाडल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू होतो, हे नेमके चाललेय काय? असा सवाल करत सत्तेसाठी जात असाल तर खुशाल जा, पण कुणाचे वय काढू नका. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांचे वय झाले असल्याच्या उल्लेखाचा संदर्भ देत त्यांनी माझे नेमके काय बिघडले, असा सवाल शरद पवार यांनी केला.