पुणे, पुढारी ऑनलाईन: 'महाराष्ट्र केसरी' विजेता मल्ल शिवराज राक्षे याचं सर्वस्तरांतून जोरदार अभिनंदन होत आहे. शेतकरीपुत्र असलेल्या शिवराजच्या या नेत्रदीपक यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून मोठं कौतुक होतंय. गतवर्षी दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकत आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून दिली आहे. आयुष्यात कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हेही त्यानं दाखवून दिलं आहे. शिवराज याच्या जिद्द आणि प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्याचे अभिनंदन करताना म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकवला. एका सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे की, आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली कुस्ती परंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी ही राज्य सरकारने पार पाडावी, असंही आमदार अजित पवार यांनी म्हटलं आहे.