पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे जिल्हा परिषदेकडून गुणवत्तेच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकनासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार शाळांनी स्वयंमूल्यमापन अहवाल सादर केल्यानंतर तालुका आणि विभागनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, त्यानंतर तालुका, विभागनिहाय पहिल्या तीन शाळा निवडल्या जातील. शाळांच्या मूल्यांकनाबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासह विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेच्या आधारे निकोप स्पर्धा होण्यासाठी शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मूल्यांकनासाठी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल, दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा, इस्पायर पुरस्कार सहभाग आणि निवड, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग या निकषांवर शाळांचे मूल्यांकन करण्यात येईल.
काही निकष काही शाळांना लागू नसल्यास त्याबाबत विचार करण्यात आला आहे. निश्चित केलेल्या निकषांनुसार स्वयंमूल्यमापन करून शाळांना त्याबाबतचा अहवाल तालुका, विभागस्तरीय शिबिरात सादर करायचा आहे. त्यानंतर तालुका, विभागनिहाय पहिल्या तीन शाळा निवडल्या जातील. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील कामकाजाचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यासाठी तालुका आणि जिल्हास्तर गुणवत्ता निश्चितीसाठी समित्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.