पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. सध्या 'पनौती' या शब्दावरुन देशात वाद सुरु आहे. राज्यातही या शब्दावरुन चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राची 'पनौैती' अस वक्तव्य केलं. आता या वक्तव्यानंतर भाजप गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे, "सर्वज्ञानी संजय राऊतजी दुसऱ्यांसाठी पनवतीची अपेक्षा करताना स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही?? (Sanjay Raut Vs Chitra Wagh)
चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सर्वज्ञानी संजय राऊतजी दुसऱ्यांसाठी पनवतीची अपेक्षा करताना स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही?? बनारसला जायचं की नाही ते आम्ही ठरवूच पण तुमचा मुक्काम हल्ली बनारसच्या अस्सी घाटावरच असतो असं तुमचं नशाबाज वर्तन पाहून वाटतंय. तिथल्या फेमस बनारसी पुडीच्या धुंदीमुळे तुमचं एकंदर ताळतंत्र सुटल्यासारखं दिसतंय. 'बम बम भोले आणि राऊतसाहेब बोले', असं काही झालंय का…? काळजी घ्या. तुमचं बेताल बडबडीचं व्यसन सुटावं ही त्या काशीनरेश बाबा विश्वनाथाचरणी प्रार्थना.!"
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राजस्थानच्या जालोर येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, 'टीम इंडिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण या 'पनौती'मुळे (अपशकून) पराभव पत्करावा लागला.' यानंतर हा शब्द खुप चर्चेत आला आहे. आता हा शब्द संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी वापरला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची "पनौती"आहे.ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही." पुढे बोलत असताना ते म्हणाले की,"२०१४ ला लागलेली "पनौती" २०२४ ला दूर होणार आहे. अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता.