![सचिन पायलट ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fsachin-pilot.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. मागील काही वर्ष काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामुळे चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता ११ जून रोजी पायलट नवा पक्ष स्थापनेची घोषणा करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. (Rajasthan Congress crisis)
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय सल्लगार कंपनी 'आय-पीएसी'कडून सचिन पायलट यांना नवीन राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळत आहे. यापूर्वीच याच कंपनीच्या स्वयंसेवकांनी ११ एप्रिल रोजी पायलट यांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाचे नियोजन करण्यात मदत केली होती. त्यावेळी सचिन पायलट यांनी भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कथित भ्रष्टाचारावर गेहलोत सरकारकडून कारवाईची मागणी केली होती. भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावर कारवाईसाठी दबाव आणण्यासाठी अजमेर ते जयपूर या पायलटच्या पाच दिवसांच्या पदयात्रेच्या नियोजनातही याच कंपनीचा सहभाग असल्याची चर्चा राजस्थानमधील राजकीय वर्तुळात आहे.
१५ मे रोजी पायलट यांच्या यात्रेचा समारोप झाला होता. यावेळी त्यांनी अशोक गेहलोत सरकारकडे तीन मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वसुंधरा राजे सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई, राजस्थान लोकसेवा आयोगाची पुनर्रचना आणि नुकसान भरपाई. परीक्षेच्या पेपर फुटीमुळे प्रभावित तरुणांसाठी मदत आदी मागण्यांचा समावेश होता. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
२९ मे रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत पायलट याची चर्चा झाली होती. यानंतर गेहलोत आणि पायलट यांना राहुल गांधी यांच्याबरोबर फोटोही काढला. राजस्थान काँग्रेसमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगण्याची ही धडपड होती. मात्र यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ३१ मे रोजी सचिन पायलट यांनी आपलण गेहलोत सरकारसमोर मांडलेल्या तीन मागण्यांशी मी कोणतीही तडजोड करू शकत नाही, असे टोंक मतदारसंघाच्या भेटीदरम्यान सांगितले होते. त्यामुळे पायलट यांची नाराजी कायम असल्याचे मानले जात होते.
११ जून रोजी सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सचिन पायलट नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या नव्या पक्षाचे नाव प्रगतीशील काँग्रेस असे असेल, अशीही चर्चा रंगली आहे.
२०१८ मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली. यानंतर राज्यात गेहलोत विरुद्ध पायलट असा संघर्ष सुरु झाला. मागील पाच वर्षांत पायलट यांनी त्यांनी अनेकवेळा बंडाची झेंडा हाती घेतला. एकदा तर उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक आमदारांसह दिल्ली गाठली होती. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची समजुत काढली मात्र त्यानंतर पायलट हे आपली मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार पाडतील, अशी अटकळ बांधली गेली. मात्र पायलट हे काँग्रेससोबतच राहिले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन पायलट नवा पक्ष स्थापन करुन काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजस्थानमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा :