पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट हा एक सांघिक खेळ. संघातील ११ खेळाडूंनी आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली तरच संघ विजय ठरतो. अशा या सांघिक खेळात संघ बांधण्याची जबाबदारी कर्णधाराची ( कॅप्टन ) असते. ( Rohit sharma IND VS SA ) कर्णधार विजीगिषू वृत्तीचा असेल तर खेळाडूंची प्रतिभा कमी असली तरी तो संघ विजयाच्या मार्गावर वाटचाल करतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये कर्णधाराचे स्थान हे कटुंबप्रमुखासारखं मानलं जातं. याच भावनेतून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी ( दि. २ ) गुवाहाटीच्या मैदानात उतरला. यावेळी क्रिकेट खेळ आणि संघाप्रती असलेल्या त्याच्या समर्पित भावनेने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २३७ धावांचा डोंगर उभा केला. यानंतर टीम इंडिया गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी रोहित शर्मा याच्या नाकातून रक्त येवू लागलं. अशावेळी अत्यंत धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याने मैदान सोडलं नाही. यावेळी त्याच्या चेहर्यावर त्याला हाेणारा त्रास स्पष्टपणे दिसत हाेता. रोहितने टॉवेलने नाकातून येणारे रक्त टिपत गोलंदाज हर्षल पटेल याला सूचना दिल्या, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल हाेत असून, राेहित शर्माच्या समर्पित वृत्तीने देशभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहेत. निकारीच्या झूंजीवेळी शारीरिक त्रास हाेत असला तरी कर्णधार मैदानात उभारला तर संघही त्याच भावनाने खेळतो हे संपूर्ण देशाने पाहिलं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यांनतर भारताने प्रथम फलंदाजी करत २३७ धावा केल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभी केली. भारताकडून सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत २२ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या. तर के.एल. राहुलने ५ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. सुर्यकुमार यादव आणि के.एल.राहुल यांच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही २८ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी केली.
भारताने आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २२१ धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉक ४ षटकार आणि ३ चौकार लगावत ६९ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने ४७ चेंडूमध्ये दिमाखदार शतक झळकावले. भारताकडून अर्शदीप सिंगने २ तर अक्षर पटेलने १ विकेट पटकावली.