शशांक तांबे
पिंपरीः भाज्यांच्या वाढत्या दरामुळे नागरिकांना डाळींचा आधार असताना आता डाळींचे भाव वाढले आहेत. इंधन दर, भाज्यांचे दर, तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने किचन मधील महागाई गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. लांबलेला पाऊस आणि क्विंटलप्रमाणे 300 ते 800 रुपयांच्या झालेल्या वाढीमुळे किरकोळ बाजारात डाळ 100 रुपये किलोच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे डाळी महाग झाल्याने कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे.
गेले काही दिवस घाऊक बाजारात डाळींचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. पुणे बाजारात चना डाळ, तूर डाळ यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. तर इतर डाळींची आवक देखील 100 ते 150 टनांच्या जवळपास होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील व्यापारी पुण्यातून डाळी आणतात.
किराणा दुकानात डाळींचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तूरडाळ, मसूर डाळ, मूग डाळ यांची विक्री जास्त होत असते. किलोमागे डाळींचे भाव सात ते आठ रुपये वाढले आहेत. सध्या खानावळीमध्ये डाळींचे प्रमाण वाढले आहे. हॉटेल, लग्नसराई, इतर समारंभ यामध्ये जेवणात डाळ आवश्यक असते. भाज्या, तेल आणि आता डाळी दरवाढ होत असल्याने केटरिंग व्यावसायिक देखील हवालदिल झाले आहेत.
बाजारात डाळींचे भाव वाढल्याने किराणा दुकानातदेखील भाववाढ झाली आहे. नेहमीच्या मागणीमध्ये असणार्या डाळी 7 ते 8 रुपयांनी महाग झाली आहेत.
-अशोक भांडारी, व्यापारी