![Rinku Singh : रिंकू सिंहची ‘या’ दिवशी टीम इंडियात होणार एन्ट्री!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2FNorth-Korea-5.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या रिंकू सिंहला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्यने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच दुस-या दिवशी टीम इंडियाच्या नव्या टी-20 संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, संघ निवडताना युवा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. खरेतर या युवा फलंदाजाला भारताच्या टी-20 संघात संधी मिळेल असे भाकीत अनेकांनी केले होते, पण ते खरे झाले नाही. अशातच आता त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. रिंकूच्या टीम इंडियातील प्रदार्पणासाठी बीसीसीआयने खास योजना आखल्याचे समजते आहे.
भारतीय निवड समिती आगामी मालिकेत प्रत्येक युवा खेळाडूला आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी दीर्घ हंगाम लक्षात घेता या सर्व खेळाडूंना ताजे ठेवण्याचा निवडकर्त्यांचा मानस आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'रिंकू सिंह आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंना निवड समिती आयर्लंडच्या दौऱ्यावर पाठवेल. निवडकर्त्यांना एकाच मालिकेत सर्वांना आजमावायचे नाही. भारतीय एकदिवसीय संघात समाविष्ट असलेले 7 खेळाडू टी-20 मालिकेचा भाग नाहीत कारण त्यांना ऑगस्टच्या शेवटी आशिया चषकही खेळायचा आहे.'
रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड यांचा आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात येणार आहे. या दरम्यान, चीनमध्ये होणाऱ्या एशियाड (एशियन गेम्स 2023) साठीही बोर्डाला एक संघ पाठवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत निवड समितीने वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना 20 ऑगस्टला तर तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्टला खेळवला जाईल.
भारतीय निवड समितीने भारत अ संघाचे दौरे वाढवण्याची मागणी बोर्डाकडे केली आहे, जेणेकरून या दौऱ्यांच्या माध्यमातून खेळाडूंची चाचणी घेता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त सामन्यांचा सराव होईल. त्यामुळे बीसीसीआयने सकारात्मकता दाखवत भारत अ संघाच्या दौऱ्यासाठी जगातील अनेक क्रिकेट मंडळांशी संपर्क सुरू केल्याचे समजते आहे.