जयसिंगपूर, संतोष बामणे : अलमट्टी (जि. विजयपूर) येथील धरणातून 1.75 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे धरण व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महापुराची धास्ती कायम लागून राहिली आहे.
कृष्णा खोरे दुथडी भरून वाहत आहे. शिरोळ तालुक्यातून राजापूर बंधार्यातून कर्नाटकात 1 लाख 4 हजार क्यूसेक पाणी कर्नाटकात विसर्ग होत आहे. अशातच अलमट्टी धरणातून विसर्ग नसल्याने पंचगंगा नदीचे पाणी उतरण्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र, अलमट्टी धरणातून 1.75 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर कृष्णेवरील हिप्परगी (ता. जमखंडी) येथील बॅरेज हा 6 टीएमसीचा असून अद्याप हिप्परगीत पाणी अडविण्यात आले नाही. त्यामुळे हिप्परगीची सर्व दारे खुली आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे जात आहे. अलमट्टी धरणाचे 20 गेट व विद्युतगृह यातून 1.75 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागाला दिलासा मिळाला असला तरी महापुराची धास्ती कायम आहे.
शिरोळमध्ये ही गावे होतात बाधित
उदगाव, चिंचवाड, कवठेसार, अर्जुनवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी, शिरढोण, कुरूंदवाड, नृसिंहवाडी, तेरवाड, बस्तवाड, अकिवाट, राजापूरवाडी, राजापूर, नवे दानवाड, जुने दानवाड, खिद्रापूर, शिरोळ, आगर, घालवाड, कोथळी, उमळवाड, मजरेवाडी, नांदणी, अब्दुललाट, शिरदवाड, औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, शेडशाळ, दत्तवाड, हेरवाड, दानोळी, टाकवडे, धरणगुत्ती, कवठेगुलंद, घोसरवाड, जयसिंगपूर.