![झोप न येण्याची कारणे व ‘हे’ आहेत उपाय](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FUntitled-design-1-25.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि आरोग्यासाठी सात-आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. मात्र, हल्ली रात्री झोप न येणे व कूस बदलत राहणे ही समस्या अनेकांना भेडसावते. सध्याच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात झोप जणू काही गायबच झाली आहे. तज्ज्ञांनी झोप न येण्याची काही कारणे व त्यावरील उपाय सांगितलेले आहेत, त्यांची ही माहिती…
झोप न येण्यामागे पुढील कारणे असू शकतात : 1. अनावश्यक चिंता करणे किंवा तणावात असणे. 2. नेहमी सतत काहीतरी विचार करणे. 3. शरीर थकत नसेल किंवा आरामदायी जगणे. 4. अनियमित जीवनशैली-रात्रीचे जेवण उशिरा करणे. 5. शारीरिक दुखणे-सर्वाइकलचा त्रास असणे इत्यादी.
झोप येण्यासाठीचे उपाय : 1. फिरणे – सगळ्यात आधी जेवणात बदल करून अधिक मसालेदार नसलेले, हलके भोजन करणे. जेवण केल्यानंतर काही वेळ फिरणे. 'शतपावली' नव्हे तर कमीत कमी 2500 पावले चालावे. झोपण्यापूर्वी स्वत:ला सांगा की, काहीच विचार करायचा नाही. हा 'मंत्र' म्हणत रहावे जोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. 2. योगनिद्रामध्ये झोपणे – झोपण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिटे प्राणायाम करणे. म्हणजे अनुलोम विलोम करणे. या नंतर श्वासनमध्ये झोपा व पूर्ण शरीराला हलके सोडा. आता सगळ्यात आधी पायाच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. मग गुडघ्यावर, मग नाभी वर, मग हृदयावर नंतर भुवयांवर लक्ष केंद्रित करा. यानंतर यावरून लक्ष काढून सावकाशपणे श्वासावर लक्ष केंद्रित करून शांत झोपा. दररोज याचा नियमित सराव करावा.