![Raver Lok Sabha 2024 | श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी दुसऱ्या एका श्रीरामने पायात चप्पल न घालण्याचा अनोखा संकल्प](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2F%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-1-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आल्याने श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेमध्ये त्यांनी जनसंपर्क वाढवलेला होता. त्यांनी उद्योगा मधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीराम पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या समोर एक कडवे आव्हान निर्माण केलेले आहे. लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी ही लढत होत आहे.
श्रीराम पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीराम हरिभाऊ इंगळे या कार्यकर्त्याने मतदारसंघातून विजय मिळावा यासाठी पायात चप्पलच घालणार नाही असा संकल्प केला आहे. एकूणच रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी दुसऱ्या एका श्रीरामने हा अनोखा संकल्प केल्याचे दिसून येत आहे. श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत ते विजयी गुलाल उधळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा संकल्प या कार्यकर्त्याने केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांचा विजय झाल्यावरच गुलाल उधळल्यानंतरच पायात चप्पल घालणार, असा संकल्प केला आहे. पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीराम इंगळे याने पुढाकार घेत ऐन उन्हाळ्यात 42 च्या पुढे तापमान गेले असताना अनवाणी प्रचार करण्याचा निश्चय केला आहे. कुऱ्हा काकोडा गावासह मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात श्रीराम इंगळे प्रचार करत असून श्रीराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.
सोमवारी (दि.६) श्रीराम इंगळे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांची घोडसगाव येथे भेट घेतली. यावेळी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार श्रीराम यांनी बोलून दाखवला आहे. श्रीराम सध्या भर उन्हाळ्यात अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता प्रचार करीत असल्याने सर्वत्र त्यांच्याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यांचा हा संकल्प श्रीराम पाटील यांना लोकसभेत पोहोचवणार काय?
श्रीरामभाऊ पाटील निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करत असून ते निवडून येणार नाहीत
तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे निवडून येईपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी मुक्ताईनगरमध्ये गावागावात जाऊन प्रचार करत आहे.
– श्रीराम हरिभाऊ इंगळे, कार्यकर्ता.