औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून १ लाख ३२ हजारांनी पराभव पत्करावा लागला होता. परंतु आता तेथील मतदारच शिर्डीमधून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह करत असल्यामुळे शिर्डीतून उभे राहण्याचा निर्धार केला आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत सांगितले.
आठवले (Ramdas Athawale) यांनी खिर्डी आणि पिसदेवी येथील खून प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. चव्हाण कुटुंबीयांना १ लाख, तर पिसादेवी येथील कासारे कुटुंबियाना ५ लाखांची मदतीची घोषणा आरपीआयच्या वतीने त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी पदाधिकारी प्रशांत शेगावकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत शोकसभा घेतली.
यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेने काहीच साध्य होणार नाही. त्यांनी भारत जोडण्यापेक्षा आपला खिळखिळा झालेला पक्ष जोडावा, असा टोला आठवले यांनी लगावला. राज्यात दलित मराठा यांची अहंकार बाजूला ठेऊन सामंजस्याची भूमिका घ्यावी. लखीमपुरी घटनेचा निषेध करीत तेथील पीडितांच्या कुटुंबीयांना तेथील प्रशासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न केल्याची माहितीही आठवले यांनी यावेळी दिली.
आरपीआयला मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद. १ एमएलसी आणि ३ महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे. तसेच आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकनाथ शिंदे गटासोबत राहणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या गटाला धणुष्य बाण चिन्ह मिळाले पाहिजे. त्यांचीच खरी शिवसेना आहे, असेही आठवले म्हणाले. फॉक्सकॉन – वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करून महाविकास आघाडी सरकार यास जबाबदार आहे. परंतु, अनेक मोठे प्रकल्प राज्याला मिळावे, यासाठी शिंदे सरकार प्रयत्न करत आहेत, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का ?