इस्लामपूर, बावडेकरांनी चाव्या फिरविल्या : राजू शेट्टी

इस्लामपूर, बावडेकरांनी चाव्या फिरविल्या : राजू शेट्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने न मागता आपणास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्याबाबत कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आग्रह धरल्यामुळे जाऊनही आलो; परंतु इस्लामपूर आणि बावडेकरांनी काय चाव्या फिरविल्या माहिती नाही, असे त्यांनी जयंत पाटील व सतेज पाटील यांना उद्देशून भाष्य केले. त्यांनी साखर कारखानदारालाच उभा केले. यामध्ये सगळेच सामील आहेत. त्यांना ऑक्टोबरमध्ये हिसका दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिला.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी स्वाभिमानीच्या वतीने दसरा चौकामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना लक्ष्य करण्यात आले. ते म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एका बाजूला खोक्यांचा बाजार करणारे आणि दुसर्‍या बाजूला लोकशाहीवर प्रेम करणारे, संविधान टिकले पाहिजे असे म्हणणारे माझे शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य आहेत. स्वतंत्रपणे आपण निवडणूक लढवत आहोत. माझ्याविरोधात साखर कारखानदार आहेत. जयंत पाटील कपटी कारस्थानी आहेत, तर आ. सतेज पाटील यांचे बोलणे मायावी आहे. गणपतराव पाटील यांच्या मागे छातीचा कोट करून उभा राहू म्हणणारे सतेज पाटील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कुठे होते. त्यावेळी त्यांनी स्वाभिमानीला एक जागा देतो; पण गणपतरावांना अर्ज मागे घ्यायला लावा, असे सांगितले होते. तेव्हा गणपतराव कोणत्या पक्षात होते आणि आता त्याच सतेज पाटील यांना त्यांचा पुळका येऊ लागला आहे. आमच्या नादाला लागू नका, ऑक्टोबरमध्ये पाहतो कोण छातीचा कोट करून येतोय.

महामार्ग रोखला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी 100 रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे दहा तासांनंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यावरून कोल्हापूरला मिळणारे 115 आणि सांगलीला मिळणारे 65 असे 180 कोटी रुपये बुडवण्याचा त्यांचा डाव आहे. शेतकर्‍यांवर वरंवटा फिरवू नका. तेवढे ते सोपे नाही, तुम्हाला पाताळातून शोधून काढून ही रक्कम वसूल करणार, असेही शेट्टी म्हणाले. वस्त्रोद्योगाला वीज सवलत, पाणीपट्टीतील वाढ कमी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊनही काही केले नाही. खताचे भाव वाढत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. रडीचा डाव खेळणे योग्य नाही, इचलकरंजीला पाणी आपणच देऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या पाच वर्षांत शेतकर्‍यांची अवस्था खूप वाईट झाली आहे. सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या उलटे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी राजू शेट्टी यांना संसदेत पाठवा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघटनेचे व्ही. एन. सिंग यांनी सांगितले.

खोके बहाद्दरांमुळे हातकणंगलेतील निवडणूक हायव्होल्टेज झाली आहे. यात शकुनीमामांच्या फौजा गावागावांत दिसू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी घराघरांत निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन प्रा. जालंधर पाटील यांनी केले. बारामतीचे सतीश काकडे यांनी शेतकरी चळवळ टिकविण्यासाठी शेट्टी यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक वैभव कांबळे यांनी केले.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सूत्रधार

महाविकास आघाडीने पाठिंबा देण्याचे कबूल केले असताना अचानक त्यामध्ये बदल करण्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सूत्रधार आहेत, असा आरोप जि.प. माजी सभापती अनिल मादनाईक यांनी सांगितले.

…तर अर्ज भरत नाही

वीस वर्षांत कोणत्या ठेकेदाराकडे किंवा बदलीच्या कामात पैस मागितले असतील, तर आताच सांगा आपण उमेदवारी अर्ज भरत नाही. आपल्याप्रमाणे विरोधकांनीही तसे जाहीर करावे, असे शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news