रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : प्रतीक्षा करायला लावणार्या मोसमी पावसाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कोकणात जोर धरला आहे. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात आता आषाढ सरींचा जोर वाढू लागला आहे. आगामी काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याने कोकण किनारपट्टी भागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या कालावधीत खोल समुद्रात मासेमारीसाठी मज्जाव करताना आणि किनारी गावांसह ग्रामीण भागातील दुर्गम गावातून सावधगिरीच्या आणि सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मोसमी पाऊस लेट झाला होता. मात्र, आषाढापासून तो कोकण किनारपट्टीत आता थेट सक्रिय झाला आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे 28 ते 30 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उकाडा मात्र कायम आहे.
बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काही भागांत जोरदार तर काही भागांत पावसाच्या रिमझिम सरींचा राबता होता. बुधवारी पहाटेपासून मात्र अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार होती. दरम्यान, पुढील तीन चार दिवस मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 47.22 मि.मी.च्या सरासरीने सव्वाचारशे मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 55 मि..मी. दोपील 47, खेड 23, गुहागर 45, चिपळूण 59, संगमेश्वर 60, रत्नागिरी 49, लांजा 68 आणि राजापूर तालुक्यात 19 मि. मी. पावसाची नोंद झाली. आज दिवसभर पावसाने सातत्य राखल्याने शहरासहीत ग्रामीण भागात पाणी साचल्याने वाहतुकही बाधीत झाली. मोसमी पाऊस जिल्ह्यात सक्रीय झाल्यानंतर आतापर्यंत 265 मि.मी.च्या सारसरीने एकूण 2400 मि.मी, पाऊस झाला. गतवर्षी याच कालवधीत पावसाने पाच हजार मि.मी.ची एकूण मजल मारली होती.