नगर, पुढारी वृत्तसेवा: यंदा साडेतीन महिन्यांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आजमितीस 490 मि.मी. पाऊस झाला असून, वार्षिक पावसाच्या तुलनेत 110 टक्के पावसाची नोंद झाली. जामखेड तालुक्यात सर्वात कमी 71 टक्के पाऊस झाला. जवळपास दहा तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांतून विसर्ग सुरु आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत सोमवारी सरासरी 13 मि.मी. पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या साडेतीन महिन्यांत सरासरी 490 मि.मी. पाऊस झाला असून, तो 110 टक्के झाला आहे. या पावसामुळे सध्या भंडारदरा, निळवंडे, मुळासह सर्वच लहान-माठी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, भिमा, सीना, घोड आदी नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. त्यामुळे या नदीकाठच्या जनतेला जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत जामखेड तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. नगर तालुक्याने जवळपास सरासरी ओलांडली आहे. नेवासा व श्रीरामपूर हे दोन तालुके देखील सरासरीच्या जवळ पोहोचले आहेत.
अद्याप परतीचा पाऊस सुरु व्हायचा आहे. परतीचा पाऊस सरासरी 20 ते 25 टक्के पडतो. त्यामुळे यंदा 150 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. यंदा देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भूजलपातळी अधिक वाढणार आहे. परिणामी विहिरी, विंधन विहिरी अधिक पाणेदार असणार आहे. त्यातून यंदाचा रब्बी हंगाम देखील जोमात असणार आहे.
नगर 476.5 (99.8), पारनेर 475 (114.7), श्रीगोंदा 507.4 (125.9), कर्जत 472.1(105.5), जामखेड 412.9 (71.7), शेवगाव 465.9(100.6), पाथर्डी 435.8 (92.1), नेवासा 423.2 (98.5), राहुरी 462.7 (107.2), संगमनेर 460.8 (131.2), अकोले 767.1 (157), कोपरगाव 525.2 (129.9), श्रीरामपूर 437.5 (94.5), राहाता 491.8 (108.3).
भंडारदरा: 814, निळवंडे :1111, मुळा:10,000, नांदूर मध्यमेश्वर :9465, सीना : 364, घोड : 9280, जायकवाडी : 14,672.