पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली. त्यानंतर आता राहुल गांधी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी गांधी यांना सावरकरविरोधी भूमिकेवर नरमाई घेण्याची सुचना केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वाढली होती. राहुल गांधी यांच्यावर ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवरच भेट होईल, असे सांगितले जात आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणूक, महाविकास आघाडी यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा