इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा : शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे महाराष्ट्रात बीआरएस पक्षाला चांगली ताकत मिळेल. शिवाय शेतकऱ्यांनाही योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी आज (दि. १) येथे व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्री व बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. येत्या ९ ऑगस्टरोजी इस्लामपुरात पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. वाटेगाव येथील जाहीर कार्यक्रमानंतर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या साखराळे येथील निवासस्थानी स्नेह भोजनासाठी थांबले होते. यावेळी रघुनाथ पाटील यांनी आपण बीआरएस पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
रघुनाथ पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना न्याय देणारा व त्यांचे प्रश्न सोडविणार एकही राजकीय पक्ष महाराष्ट्रात नाही. बीआरएस पक्षाने तेलंगणातील शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत दिले आहे. शिवाय अनेक सवलतीही दिल्या आहेत. त्यामुळे देशात केवळ हाच पक्ष शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी आमची धारणा झाली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर ७ तास चर्चा झाली. या चर्चेत शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाबाबत समाधान झाल्यानेच आम्ही या पक्षात प्रवश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ ऑगस्टला क्रांतीदिनी इस्लामपुरात पक्षाचा भव्य मेळावा घेणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष चले जावचा नारा देणार आहोत. यावेळी भगीरथ भालके, बी. जी. पाटील, हणमंत पाटील, गणेश शेवाळे आदीसह शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. K. Chandrashekar Rao
राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आम्ही पाठिंबा देवून पाहिला. मात्र, एकाही पक्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. राज्यातील सर्व नेते लुटारु आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आलीबाबा असून बाकीचे चाळीस चोर आहेत, अशी टीकाही रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली.
हेही वाचा