राशिवडे: पुढारी वृतसेवा – पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी धबधब्याकडे येण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे राज्यासह कर्नाटक, कोकण, गोवा भागातून पर्यटक येत असतात. दोन, तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या प्रवाहातून लहान, मोठे दगड येत असल्याने आणी प्रवाह वाढल्याने राधानगरी तहसिल व राधानगरी पोलीसांनी गांभीर्य ओळखून अनिश्चित काळासाठी या धबधब्याकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली आहे. धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. तरी गांभीर्य आणि धोका ओळखुन पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख, पो. नि. ईश्वर ओमासे यांनी केले आहे.