भेंडा; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचार्याने केवळ बँक शाखा बदलल्याने चालू असलेले निवृत्तीवेतन वर्षांपासून बंद झाले आहे. तसेच, कागदपत्रांची पूर्तता करून चार वर्षे उलटली, तरी वारस पत्नी निवृत्ती वेतनापासून वंचित आहे. त्यामुळे 'सांगा साहेब, आम्ही जगायचं कसं?', असा आर्त सवाल करीत, त्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना साकडं घातलं आहे.
मुकिंदपूर येथील कर्मचारी गुलाब वाघ यांना 2019 पासून सेवानिवृत्त वेतन सुरू झाले. 2022 मध्ये त्यांनी सोयीसाठी बँक शाखा बदलली. तेव्हापासून निवृत्तीवेतन बंद झाले. वाघ यांनी एक वर्षात नगर कार्यालयात दोन वेळा, नाशिक कार्यालयात तीन वेळा हेलपाटे मारून आधार कार्ड, बँक खाते पुस्तक, बँकेचे पत्र, जीवन प्रमाणपत्र, या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.
याशिवाय पाच वेळा मेलवर तसेच, रजिस्टर पोस्टाने सर्व कागदपत्रे पाठवूनही अद्यापही त्यांना निवृत्तीवेतन मिळालेच नाही. सेवानिवृत्त कर्मचारी नानासाहेब काळे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आसराबाई काळे (वय 79) यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता फेब्रुवारी 2019 मध्येच नाशिक कार्यालयात केली. मात्र, तब्बल चार वर्षे उलटूनही त्यांना अद्याप सेवानिवृत्ती वेतन मिळाले नाही. तुटपुंजे निवृत्तीवेतन, तेही वेळेत मिळत नाही. प्रशासनाच्या चुकीने, निष्काळजीपणाने काहींना वर्षभर, तर काहींना 4 वर्षे वंचित आहेत. त्यामुळे आई जेऊ घालीना अन् बाप भीक मागू देईना, अशी सेवानिवृत्त कर्मचार्यांची अवस्था झाली आहे.
मिळणारे निवृत्तीवेतन अत्यंत तुटपुंजे असून, त्यातून खोलीभाडे, औषधोपचार, महिन्याचा खर्च भागवायचा कसा? निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नसल्याने जगायचं कसं?
– गुलाब वाघ, मुकिंदपूर, ता. नेवासा.
कार्यालयात हेलपाटे मारायला वयोमानाने तब्येत साथ देत नाही. आज ना उद्या वेतन मिळेल, या आशेवर दिवस काढत आहेत. प्रशासनाने दखल घ्यावी.
-आसराबाई काळे, वाकडी, ता. नेवासा.