नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे- सातारा महामार्गावर दोन कंटेनर व दोन बसमध्ये झालेल्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले असून मृतात एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर नसरापूर, वेळू, खेड शिवापूर, कापूरहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून जवळपास ३० ते ३५ जण जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर), कंटेनर चालक शिवराजकुमार एच आर (रा. कर्नाटक) असे ठार झालेल्याचे नाव असून दोन मृतांची नावे कळू शकली नाहीत.
सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर), रत्ना रवींद्र पुजारी (वय ३८), रवींद्र रामा पुजारी वय ४१ ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विना प्रभाकर गौडा (वय ३४), ज्योती जयराम गौडा (वय ३९), पर्वतमा देवे गौडा (वय ४२), हेमा अण्णा गौडा (वय ३५), मीनाक्षी माय शेट्टी गौडा (वय ३५), संजू रवी गौडा (वय २४), प्रदीप नंजापा गौडा (वय २५, सर्व रा. कर्नाटक, सध्या रा. पुणे) अशी जखमीचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक असून ही घटना पुणे सातारा महामार्गावर वरवे ( ता. भोर ) येथे रविवारी (दि. ११) सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकवरून आलेल्या श्रीकृष्ण लक्झरी बसने पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टासाठी सेवा रस्त्यावर उलट दिशेने यु-टर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. परिणामी लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली. यात लक्झरी चालक जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. यावेळी पुणेकडून येणाऱ्या शिवशाही बसला धडकली.
त्याचवेळी मागून येणारा कंटेनर शिवशाही बसला धडकला. यावेळी राजगड पोलीस, महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली. तसेच तीन क्रेनच्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करण्यात आली. तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये व इतर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
महामार्गावरील सेवा रस्ता व पुलाचे काम अर्थवट असल्याने हा अपघात झाला असून याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा