नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्यांनी अदानी उद्योगसमुहातील कंपन्यांत ३४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी (दि.१३) लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. जनरल विमा कंपन्यांच्या एकूण व्यवस्थापन मालमत्तेच्या (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) तुलनेत ही रक्कम ०.१४ टक्के इतकी असल्याचेही कराड यांनी नमूद केले.
दरम्यान, कर्नाटकमधील भद्रावती येथील स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अखत्यारितील विश्वेश्वरैय्या पोलाद प्रकल्प बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे कराड यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. वरील प्रकल्पाचे खाजगीकरण करण्याचा इरादा आधी सरकारने व्यक्त केला होता व त्यानुसार जुलै २०१९ पर्यंत स्वारस्य अभिव्यक्ती पत्रे मागविण्यात आली होती. तथापि, निविदेला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे गतवर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सततच्या तोट्यामुळे हा प्रकल्प बंद करावा लागत असल्याचेही कराड यांनी सांगितले.