पुढारी ऑनलाईन डेस्क : Prithvi Shaw Captain : भारतीय संघ ऑगस्टमध्ये 3 टी-20 सामन्यांसाठी आयर्लंड दौरा करणार आहे. विंडीजविरुद्ध सर्व क्रिकेट प्रकारांतील मालिका संपन्न झाल्यानंतर लगोलग ही स्पर्धा होणार आहे. उभय संघांतील ही छोटेखानी मालिका दि. 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याने आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय वरिष्ठ खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंना संधी देईल अशी चर्चा रंगली आहे.
बीसीसीआय युवा खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी पाठवण्याचा विचार करत आहे. यात 15 युवा खेळाडूंचा समावेश अशी चर्चा आहे, ज्याचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे सोपवले जाऊ शकते. मात्र, अद्याप याची अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण असे झाल्यास भारतीय संघाची भविष्यातील बांधणी कशी असेल याची झलक नक्कीच पहायला मिळेल असे अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे. पृथ्वी शॉने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यामुळे तो आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंनाही या दौऱ्यात संधी दिली जाऊ शकते. (Prithvi Shaw Captain)
टीम इंडियाने यापूर्वी दोन सामन्यांचा टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकून यजमान आयर्लंडचा 2-0 ने धुव्वा उडवला होता. त्यावेळी हार्दिक पंड्याने संघाचे नेतृत्व केले होते.
पहिला सामना : 18 ऑगस्ट
दुसरा सामना : 20 ऑगस्ट
तिसरा सामना : 23 ऑगस्ट