हुपरी : मार्च महिन्यानंतर चांदी दरात जोरदार वाढ सुरू झाली असून, सध्या चांदीचा भाव 80 हजार रुपये प्रतिकिलो असा उचांकी झाला आहे. चांदीचा दर एक लाखाचा टप्पा गाठतो की काय, अशी चर्चाही होत आहे. लग्नसराईच्या तोंडावर दरवाढीची नागरिकांना झळ बसणार आहे. सोने दरानेही उच्चांक गाठला आहे.
गेल्या काही दिवसांत चांदी पाऊण लाख रुपये प्रतिकिलो झाल्यामुळे हुपरीसह दहा गावांत मंदीचे सावट पसरले आहे. दर वाढल्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे. 5 जी प्रणाली आणि सौरऊर्जा प्रणालीत चांदीचा वापर वाढल्याने दरवाढ होत असून, त्यास आंतरराष्ट्रीय घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत. मंदीमुळे हजारो जणांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. चांदीचा वापर पैंजण आणि इतर वस्तूंत होत आहे. भारतात चांदीची नाणी, दागिने तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. हुपरी परिसरात चांदी दागिने घरोघरी बनवले जातात. येथे अनेक उद्योजक घडले आहेत. दरवाढीचा फायदा चांदीमध्ये गुंतवणूक करणार्यांना झाला आहे; पण दागिन्यांची मागणी कमी होते. याचा थेट फटका उद्योगाला बसतो.
दरवाढीची कारणे
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य स्थिती, मध्यवर्ती बँकांचे स्थिर राहिलेले व्याजदर व जगातील मोठ्या देशांतील निवडणुका व काही देशांनी बदलेले चलन आदीमुळे दरवाढ होत असल्याचे बोलले जात आहे. लोक मोठ्या प्रमाणावर चांदी व सोने यात सुरक्षित म्हणून गुंतवणूक करीत असून, दरवाढीची सरासरी मोठी असल्यामुळे त्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम म्हणून चांदी-सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.