![डॉ. प्रमोद सावंत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर या पूर्वी जनसंघ व भाजपाचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील काही वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झालेला आहे. त्यामुळे आता 'यही समय है, सही समय है' असे म्हणत रत्नागिरी लोकसभा कुणाला सोडण्याचा प्रश्नच नाही, हा मागायचाही विषय नाही. हक्काने सांगतो, या ठिकाणी कमळच फुलणार अशी स्पष्ट भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीसह रायगड व मावळमध्ये देखील यावेळी कमळ फुलणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
संबधित बातम्या
भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा रत्नागिरीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता व बूथप्रमुखांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मार्गदर्शन करताना, कार्यकर्त्यांच्या मनासारखे व्हायचे असेल तर कामाला लागा, असे स्पष्ट संकेत दिले. आपण मावळपासून रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत असून, तिन्ही मतदारसंघात भाजपाला अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे 'यही समय है, सही समय है' असल्याचे सांगत, मागील दहा वर्षात येथील खासदारांनी काही केले नाही त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा विचार करावा, मग विधानसभेचा करुया असे त्यांनी संगितले. मोदी सरकार हे कुणा जातीधर्माच्या विरोधात नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. या भागाचा विकास करायचा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार भाजपचा आल्यावरच मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण होईल. येथील खासदारांना स्पीडने काम जमले नाही. त्यामुळे दहा वर्षात विकास काय केला हे आता प्रत्येकाने विचारायला हवे, असे डॉ. सावंत म्हणाले.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चांगले काम करीत आहेत. या ठिकाणी भाजपा आणखी दोन पक्षांसह सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही बोलायच म्हटलं तर भीती वाटते असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हणताच स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात एकच हशा पिकला.