वॉशिंग्टन : सुमारे 53 कोटी वर्षांपूर्वी 'केम्ब्रियन स्फोटा'नंतर पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठाच धोका निर्माण झाला. याच काळात सध्या आपण ज्या मोठ्या प्राणीसमूहांना पाहतो, त्यापैकी बहुतांश प्राण्यांचे जीवाश्म मिळणे सुरू होते. या प्राण्यांमध्ये सागरी जलचर मोठ्या प्रमाणात होते. आर्मर्ड ट्रायलोबाईटस्, तीन फूट लांबीची कोळंबी, काटे असलेले किडे यांचा यामध्ये समावेश होता.
हे जीवाश्म दर्शवतात की, केवळ वीस वर्षांनंतरच्या काळात असे काही घडले की, महासागरातील 45 टक्के जीव नष्ट झाले. हा एक महासंहारच होता व तो विषारी वायूमुळे घडला, असे आता संशोधकांनी म्हटले आहे. लो-ऑक्सिजन किंवा अॅनॉक्सिकची स्थिती तसेच हायड्रोजन सल्फाईड या विषारी वायूच्या फैलावाचा हा परिणाम होता.
'केम्ब्रियन एक्सप्लोजन' म्हणजे असा काळ ज्यावेळी बहुपेशीय प्राण्यांची अत्यंत वेगाने वाढ झाली. त्यापैकी बहुतांश जीव हे जलचर होते. त्यांच्या वेगवान वाढीलाच 'केम्ब्रियन स्फोट' असे संबोधले जाते. हे जीव समुद्रतळाशी मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या जैविक घटकांचे विघटनातून निर्माण झाले. तसेच त्यांनी पाण्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन शोषून घेतला, असे एका सिद्धांतात म्हटले आहे. आता याबाबत नवे संशोधन झाले आहे. त्याची माहिती 'जिओफिजिकल रिसर्च लेटर्स' मध्ये प्रकाशित करण्यात आली.
त्यानुसार या मृत्यूच्या लाटेला आणखी काही तरी घडल्याने उत्तेजना मिळाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हायड्रोजन सल्फाईड या विषारी रासायनिक वायूचा फैलाव झाला. त्यामुळे सागरी जीवनाचा मोठा र्हास झाला. चीनमधील झियानच्या नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीतील जिओकेमिस्ट चाओ चांग यांनी म्हटले आहे की, बहुतांश सागरी जलचरांना मारण्यासाठी हे रसायनच कारणीभूत ठरले. अशा वातावरणात कोणताही प्राणी अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. दक्षिण चीनमधील यांगत्से प्लॅटफॉर्म या मोठ्या पठारावरील जिओलॉजिकल नोंदींचा यासाठी अभ्यास करण्यात आला.