पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाने काही मार्गांवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या सुमारास बस गाड्या रिकाम्या धावत असल्यामुळे मार्गांच्या वेळेमध्ये बदल केले आहेत. बदलांची अंमलबजावणी पीएमपीच्या शहरासह ग्रामीण भागाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाने उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्याच्या दृष्टीने शहरातील 15 डेपो अंतर्गत असलेल्या मार्गांची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही मार्गांवर पहाटेच्या सुमारास अजिबात प्रवासी उपलब्ध होत नव्हते. तशीच स्थिती रात्री उशिराच्या वेळी देखील होती. प्रशासनाने केलेल्या पाहणी दरम्यान असे काही मार्ग निदर्शनास आले आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागासह शहरातील पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस आणि रात्री उशिराच्या वेळेस प्रवाशांना बसची वाट पहावी लागणार आहे.