नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावरून आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याच काॅंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा एक समूह पंतप्रधान मोदींच्या चारचाकीपासून काहीच मीटर अंतरावर उपस्थित होते. (PM security viral video)
या संदर्भातील व्हिडिओ राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत असं म्हंटलं आहे की, "या भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे", असं नवाब मलिकांनी ट्विट केलं आहे.
व्हिडिओमधील हा समूह भाजपचा झेंडा घेऊन 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहे. पंतप्रधानांच्या गाडीजवळच हा कार्यकर्त्यांचा समूह मोठ्या आवाजात घोषणा देत आहे. पंतप्रधान यांची काळ्या रंगाची टोयोटा फाॅर्च्युनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभी आहे, त्या गाडीजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांचा समूह दिसत आहे. पंतप्रधानांची गाडी हळुहळू पुढे सरकत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये विशेष सुरक्षा दलाचे (SPG) जवान गाडीच्या आजुबाजूला दिसत आहेत.
पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंजाबमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूटी राहिल्याने रद्द करण्यात आली. कारण, आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ ते २० मिनिटं उड्डाण पुलावर थांबावं लागलं. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि राज्य सरकारने मोदींच्या सरक्षणाची हमी दिली असतानाही, त्यात घोडचूक झाल्याने भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आलेली असून त्यांनी म्हंटलं आहे की, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो", अशी प्रतिक्रिया मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिली. (PM security viral video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होता. त्यामुळे ते भटिंडा येथे पोहोचले आणि तेथून ते हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार होते. परंतु, पाऊस आणि खराब वातावरण यामुळे पंतप्रधानांना हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहावी लागली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने रस्त्याने ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचा निर्यण घेतला.
हा प्रवास २ तासांचा होता. अशात गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. या भरोशावर पंतप्रधान रस्त्याने प्रवासासाठी निघाले. मात्र, राष्ट्रीय स्मारकापासून केवळ ३० किलोमीटर पंतप्रधानांचा ताफा आला असताना त्या उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी रस्ता अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना पुन्हा २० मिनिटं थांबावे लागले.
यावर गृहमंत्रालयाने सांगितले की, "या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे."