पुढारी ऑनलाईन: मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याबाबत संसदेत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे, या निर्णयाला विरोध करणाऱ्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. मंगळवारी प्रयागराजमध्ये विरोधकांच्या हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर दिले. प्रयागराज येथे झालेल्या महिला सक्षमीकरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुलींनाही त्यांच्या अभ्यासासाठी, प्रगतीसाठी समान संधी मिळावी, अशी इच्छा असते.
त्यामुळे मुलींचे लग्नाचे वय २१ वर्षे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देश हा निर्णय मुलींच्या हितासाठी घेत आहे, मात्र याचा त्रास कोणाला होत आहे , हे सर्वजण पाहत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, यूपीच्या महिलांना डबल इंजिन सरकारने दिलेली सुरक्षा, त्यांनी दिलेला सन्मान हे अभूतपूर्व आहे. मुलींना पोटात मारता कामा नये, त्या जन्माला याव्यात, यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या माध्यमातून समाजातील चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी जे काम केले जाते ते संपूर्ण देश पाहत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या १ लाखाहून अधिक लाभार्थी मुलींच्या खात्यावर कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्याचा बहुमान मला मिळाला आहे . यूपी सरकारने बँक सखींवर 75 हजार कोटींच्या व्यवहारांची जबाबदारी सोपवली आहे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या माझ्या बहिणी आणि मुली 75 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत. उत्तर प्रदेशातील महिलांनी, माता-भगिनींनी-मुलींनी ठरवले आहे- आता पूर्वीच्या सरकारांचा काळ परत येऊ देणार नाही. आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुलींची संख्या खूप वाढली आहे, पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रसूतीनंतरही आईला आपल्या बाळाची काळजी घेता यावी आणि आपले कामसुद्धा चालू ठेवता यावे यासाठी महिलांची प्रसूती रजा 6 महिने करण्यात आली आहे.