नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- अनुदानित खतांसाठी 'भारत' नावाचा नवा ब्रॅंड बनविण्यात आला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. १७ )भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पीएम शेतकरी सन्मान संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिली. ( One Nation One Fertilize) यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 600 शेतकरी समृध्दी केंद्रांचे उद्घाटनप्रसंगी करण्यात आले.
'एक देश-एक खत' संकल्पना डोळ्यासमोर ठेवून अनुदानित खते एका ब्रॅंड नावाने विकली जाणार आहेत. 'भारत' हे नाव त्यासाठी देण्यात आले आहे. खत संकट कमी करण्याबरोबरच खतांवरील अनुदानाचा भार हलका करणे, हे सदर योजनेचे उद्देश आहे. अनुदान तत्वावरील युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी), म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) आणि एनपीके खते 'भारत' ब्रॅंडने विकली जातील, असे मोदी यांनी सांगितले.
कृषीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आणि औजारे एकाच ठिकाणी मिळण्यासाठी शेतकरी समृध्दी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यातील पहिल्या सहाशे केंद्रांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. आगामी काळात देशभरातील 3.3 लाख खत विक्री केद्रांचे रुपांतरण पीएम-किसान समृध्दी केद्रांमध्ये करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या केंद्रांमध्ये खतांबरोबरच बि-बियाणे, कृषी औजारे मिळतील. शिवाय माती परिक्षण, खत आणि बियाणांच्या परिक्षणाची सोय याठिकाणी असेल. खत विषयावर वाहिलेल्या 'इंडियन एज्' या ई-मॅगझिनचे लॉंचिंगही यावेळी मोदी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, खत आणि रसायन मंत्री मनसुख मंडालिया आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :