कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या. शेतकर्यांना बियाणे आणि खते वेळेवर मिळतील अशा द़ृष्टीने नियोजन करा, अशा सूचना शालेय शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र अधिक असून ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान पातळीवर खताचे वाटप करण्यात यावे तसेच विविध कंपन्यांच्या बियाण्यांची गुणवत्ता तपासून घेण्यात यावी, असे निर्देश दिले. चंदगड, आजरा या तालुक्यात युरियाची टंचाई आहे. त्याची पूर्तता करावी, अशी अपेक्षा आ. राजेश पाटील यांनी केली. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाकडे बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आ. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली. सर्व तालुक्यांना खतांचे वाटप वेळेवर आणि समान व्हावे, अशी सूचना आ. प्रकाश आवाडे यांनी केली.
पेरणीयोग्यक्षेत्र 4.77 लाख हेक्टर
जिल्ह्यात एकूण 1234 गावे असून 1029 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 7.76 लाख हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र 4.77 लाख हेक्टर इतके असून जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1971 मिलिमीटर असल्याची माहिती दिवेकर यांनी दिली.