पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री (WCD) आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आणि पगारी सुट्टी धोरणासंदर्भात वक्तव्य केले आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. (Paid Menstrual Leave)
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सदस्य मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला आणि बाल विकास (WCD) आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या की, "मासिक पाळी आल्याने स्त्री 'अपंग' होत नाही आणि त्यामुळे 'पगारी रजा योजनाचे'ची गरज नाही. मासिक पाळी हा महिलांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. मासिक पाळी हा अडथळा नसून, महिलांना समान संधी नाकारल्या जातील अशा समस्या आपण मांडू नयेत."
गेल्या आठवड्यात स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना उत्तर देताना लोकसभेत सांगितले होते की, सर्व कामाच्या ठिकाणी सशुल्क मासिक पाळीची रजा अनिवार्य करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.
राज्यसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात, स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की "महिला/मुलींचा एक लहान भाग गंभीर डिसमेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे औषधांच्या वापरामुळे नियंत्रित केले जावू शकतात. त्यांनी राज्यसभेत असेही सांगितले की, " केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भागधारकांशी सल्लामसलत करून मासिक पाळी स्वच्छता धोरणाचा मसुदा तयार केला आहे. केंद्र सरकार 10-19 वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आधीच राबवत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राबविलेल्या मिशन शक्तीच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या घटकांतर्गत मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे हा मुख्य हेतू आहे.
मासिक पाळी आल्याने स्त्री 'अपंग' होत नाही आणि त्यामुळे 'पगारी रजा योजनाचे'ची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
हेही वाचा