बिजनौर : सरकारी नोकरदार असो किंवा खासगी कर्मचारी, प्रत्येकाला आठवड्यातून किमान एका दिवसाची सुटी लागतेच. काहीजणांसाठी आठवड्यातून दोन दिवसांची सुटी मिळते. शिवाय हक्काच्या रजा, किरकोळ रजा, आजारी रजाही असतातच. गरजेप्रमाणे या रजांचा वापर कर्मचारी करत असतात. उत्तर प्रदेशामधील बिजनौर जिल्ह्यातील एक कर्मचारी मात्र सर्वांत कमी रजा घेण्यामुळे चर्चेत आला आहे. या कर्मचार्याने आपल्या 26 वर्षांच्या नोकरीत फक्त एकच रजा किंवा सुटी घेतली आहे आणि यामुळे त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजपाल सिंह असे या कर्मचार्याचे नाव असून, ते बिजनौरमध्ये राहतात. त्यांनी आपल्या 26 वर्षांच्या सेवेत केवळ एक दिवस रजा घेतली आहे. विशेष म्हणजे ते रविवारीसुद्धा कार्यालयात येऊन काम करतात.
तेजपाल सिंह 26 डिसेंबर 1995 रोजी एका खासगी कंपनीत प्रशिक्षणार्थी लिपिक म्हणून रुजू झाले होते. कंपनीच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि सणाच्या सुट्ट्यांचा समावेश केला तर प्रत्येक कर्मचार्याला एका वर्षात अंदाजे 45 सुट्ट्या मिळतात. पण, तेजपाल यांनी 1995 ते 2021 या काळात केवळ एकच रजा घेतली. 18 जून 2003 रोजी त्यांचा धाकटा भाऊ प्रदीप कुमारच्या लग्नासाठी त्यांनी ही सुट्टी घेतली होती. होळी, दिवाळीचा सण असो किंवा रविवार, ते अजिबात घरी थांबत नाहीत. सुट्टीच्या दिवशीदेखील ते कार्यालयात येत असतात.