नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या वेदना जाणायला या सरकारला वेळच नाही. सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त आहे. राज्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी करत होतो. पण, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकार मदत करते. त्या विभागाची बैठक सुद्धा मंत्र्यांनी घेतली नाही. असेही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. तर नुसती तोंड बघून ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे.
संबंधित बातम्या
दुष्काळ घोषित झालेल्या १००० मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही. राज्य सरकारने हात वर केलेले आहेत. या स्थितीत शेतकरी जगणार कसा?. मराठवाड्यात धरणात पाण्याचा साठा केवळ ३६ टक्के शिल्लक आहे. अजून सात महिने काढायचे आहेत. पिण्याचे पाणी नाही, शेती पिकत नाही, या स्थितीत शेतकऱ्यांना किडनी विकायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार असून खरेतर या सरकारने या राज्यातील शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे. दरम्यान, सरकारचं आणि मनोज जरांगे पाटील यांचं काय ठरलं? ते हिवाळी अधिवेशनात आम्ही विचारणार आहोत असेही ते म्हणाले.
तसेच तुमचं गुपचूप काय ठरलं ते आम्हाला सांगावं लागेल. आमचा आरक्षणाला विरोध नसून केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही मागणी आजही कायम आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.