नायगाव; पुढारी वृत्तसेवा : मुलांना चांगले शिक्षण व गावाकडे आपले छानसे टुमदार घर असावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. मात्र, पैशाची जुळवाजुळव करताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते. अशातच घरकामासाठी लागणार्या साहित्यांचे दर गगनाला भिडल्याने नवीन घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीवाडी व शेतीला जोडधंदा म्हणून असलेले दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायापलीकडे ठोस उत्पन्न मिळणारे साधन नाही. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला तर ठीक, अन्यथा उत्पादनासाठी गुंतवलेले भांडवल मिळणे मुश्कील होते. अशा कारणांमुळे सर्वसामान्य नागरिक कायमच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतीवाडीत घाम गाळून मिळणार्या चार पैशांत मुलांना चांगले शिक्षण व गावाकडे आपले एक टुमदार घर असावे, अशी छोटी स्वप्न सर्वसामान्यांची आहेत. मात्र, ठोस उत्पन्नाचे साधन असलेला शेती व्यवसाय बाजारभावाअभावी अडचणीत सापडला आहे. दुधाला चांगला बाजारभाव मिळाला तर खाद्यांचे दर वाढलेले असतात. चिकनच्या मागणीत वाढ झाल्यास रोगराई दारात उभी असते. दरम्यान, सर्वसामान्य नागरिक कायमच अडचणींचा सामना करतो. यामुळे छोटेसे घर व मुलांचे शिक्षण अशा मूलभूत गरजांसाठी सर्वसामान्य नागरिकांना कायमच शर्यत करावी लागते.
बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ
कसेबसे भांडवल उभे करून ग्रामीण भागात सध्या अनेक नवीन घर बांधणी सुरू आहे. मात्र, वीट, वाळू, लोखंड, फरशी व इतर साहित्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मजुरांचीदेखील कमतरता भासते. याचबरोबर आपल्याला परवडेल अशा दरात काम करणार्या गवंडी कामगारांची शोधाशोध करावी लागते. आदी कारणांमुळे नवीन घरबांधणी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे.
सध्याला बांधकाम व्यवसायात प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे गुणवत्ता असेल, तरच घर काम मिळत आहे.
– विलास सोळंके, बांधकाम व्यावसायिक