पुढारी ऑनलाईन : शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताच, पक्षातील अनेक नेते भावूक झाले. यानंतर प्रत्येकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील भावूक झाले. या भावनिक प्रसंगी जयंत पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले. (ncp chief sharad pawar resigns)
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले, शरद पवार बाजूला गेले, तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जाणार. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाने ओळखला जातो. त्यांना निवृत्त स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केले. यावेळी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा (NCP) नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज (दि. २) केले. त्यांच्या या घोषणे नंतर सभागृहाने जोरदार घोषणाबाजी करत, निवृत्तीची मागणी परत घेण्यासाठी भावनिक साद घातली.
शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, या मागणीवर कार्यकर्ते ठाम राहिले. अजित पवार, जयंत पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा केली. यानंतर अजित पवार म्हणाले की, याबाबत एक समिती स्थापन केली जाईल, यामध्ये पक्षाती ज्येष्ठ नेते असतील.या समितीचा निर्णय शरद पवारांना मान्य असेल, असे स्पष्ट करत सर्वांनी शांत राहावे. तर बैठकीत सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आताच निर्णय जाहीर करावा,अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही, आम्ही येथून हालणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.