नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुढील तीन महिन्यांत ४ हजार २०० तलाठींची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यात नाशिक विभागातील ५०० तलाठ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदांमध्ये साधारणत: ४,२०० तलाठी पदांचा समावेश आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा होती. पण पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यास सांगितले आहे. भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठीच विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. टीसीएस व आयबीपीएस कंपन्यांमार्फत भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
.सारूळ प्रकरणी वकील देणार
सारूळच्या खाणींच्या क्षेत्रातील अवैध उत्खननाबाबत नगरच्या पथकाने विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे. सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे ड्रोन सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करत तेथील उत्खनन व राॅयल्टीची सांगड घालत खाणपट्टेधारकांवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. सारूळ प्रकरणी न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकील देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खाणमाफियांचे धाबे दणाणले आहे