नाशिक : पुढारी वृत्तसेवा-काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडाे न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेत आसाम राज्यात गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच राहुल गांधी यांना शंकराच्या जन्मस्थळी असलेल्या मंदिरात जाण्यापासून भाजप शासनाने दडपशाहीने रोखण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये निषेध नोंदविला.
भाजप व भाजपप्रणीत सरकारचा राहुल गांधींच्या लोकप्रियतेमुळे तोल घसरला आहे. त्यामुळे ते दडपशाही पद्धतीने गांधींना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारत जोडो न्याय यात्रा कोणीही अडवू शकत नाही. भाजपच्या दडपशाहीला काँग्रेस कार्यकर्ता कधी घाबरणार नाही. त्यांना उत्तर दिले जाईल, असे मत पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी पदाधिकारी राजेंद्र बागूल, स्वप्निल पाटील, हनीफ बशीर, वसंत ठाकूर, जावेद इब्राहिम, फारुख मन्सुरी, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :