नाशिक : ब्रह्मगिरी पर्वतावरुन घरंगळत आलेला दगड थेट भाविकाच्या डोक्यात

फाईल फोटो
फाईल फोटो

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नारायण नागबळी पूजेसाठी आलेला भाविक आपल्या कुटुंबीयांसह ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी जात असताना डोंगरावरून घरंगळत आलेला मोठा दगड थेट डोक्यावर पडून भानुदास अश्रुबा आरडी (35, रा. हरकी लिमगाव, बीड) या भाविकाचा जागीच मृत्यू झाला.

भानुदास हे आपल्या कुटुंबीयांसमवेत नारायण नागबळी विधीसाठी आले होते. त्यांचा पूजाविधी बुधवार (दि.३) पासून सुरू होणार होता. भानुदास हे मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे आले. गुरुजींकडे नागबली पूजेसाठी बोलणी करून दुपारी ब्रह्मगिरीवर जात होते. भातखळा येथून पर्वताच्या पायऱ्या सुरू होतात. तेथून काही अंतरावर हनुमानाचे मंदिर आहे. त्या परिसरात भानुदास पायऱ्या चढत असताना डोंगरावरून निसटलेला दगड कोसळला आणि अंगावर पडला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला जखमा झाल्या. रक्तबंबाळ होऊन ते जागीच कोसळले. त्यांच्यासमवेत असलेली पत्नी आणि आई यांना याची माहिती मिळताच पर्वतावरून खाली ब्रह्मसावित्री परिसरात धावत आल्या.

सापगावमार्गे लग्नस्तंभ गंगाद्वार मेट येथपर्यंत रुग्णवाहिका नेण्यात आली. परिसरातील युवकांनी गंगाद्वार भातखळा या रस्त्याने भानुदास यांना डोली करून रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव आणि मदत करण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांना जीव गमवावा लागला.

संरक्षक जाळी बसविणे गरजेचे

ब्रह्मगिरी पर्वतावरून अशा प्रकारे दगड कोसळतात. काही वेळेस माकडांनी ढकललेले दगड असतात. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. यासाठी सप्तशृंगगडाप्रमाणे लोखंडी संरक्षक जाळी बसविण्याची मागणी होत आहे. मात्र वनखात्याच्या अखत्यारित असल्याने याबाबत कार्यवाही होत नाही.

ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सातत्याने घरंगळत येतात. काही वेळेस माकडांच्या हालचालींनी तसे होते. तसेच पावसाळ्यात डोंगरापासून विलग झालेले दगड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी तातडीने वरच्या बाजूला डोंगराला संरक्षक लाखंडी जाळी लावणे गरजेचे आहे.

– अंकुश परदेशी, शहरप्रमुख, युवा सेना, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news