नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भाजपची कार्यकारिणी (BJP Meeting) बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत "भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचा दुवा म्हणून काम करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेचा पाठिंबा भाजपला मिळेल", असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भाजप हा एका कुटुंबाभोवती चालणारा पक्ष नाही, तर तो सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर वाटचाल करतो", असंही पंतप्रधान मोदींनी भाषणात म्हंटलं आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले. या कार्यकारिणीच्या बैठकीत (BJP Meeting) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सादरीकरण केले. पंजाब प्रदेश शाखेनेदेखील निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत माहिती दिली, असंही यादव यांनी सांगितले.
"जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांचे भाजपने नेहमीच विचार केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष आणि जनता यांच्यात विश्वासाचा सेतू म्हणून काम करावे. कोरोनाकाळातही पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करण्यावर भर दिला", असेही पंतप्रधानांनी म्हणाले. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ठराव मांडला. या ठरावात मोदी सरकारच्या विविध उपाययोजनांबद्दल स्तुती करण्यात आले. त्याबाबतच्या ठरावाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. कोरोनाकाळात जनतेत विनाकारण भीती निर्माण करण्याच्या विरोधकांच्या संधिसाधू राजकारणाचा ठरावात निषेध करण्यात आला.
जे. पी. नड्डा म्हणाले की, "भाजपने संघटना विस्ताराचे उद्दिष्ट ठेवताना २५ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व १० लाख ४० हजार मतदान केंद्रनिहाय पक्ष समित्या नेमण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच ज्या राज्यांमध्ये पक्षाचा विशेष विस्तार झालेला नाही अशा केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणमध्ये विस्ताराचे ध्येय आहे", असंही त्यांनी स्पष्ट केले. "पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव झाला असला, तरी राज्यात मोठी झेप घेतल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही पद्धतीने पक्ष राज्यात संघर्ष करेल", असे केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले.
पहा व्हिडिओ : आणि छ. शाहू महाराजांनी दिली भाऊबीजेची अनोखी ओवाळणी…