![नाना पटोले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2FUntitled-design-2023-02-07T120303.917.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडे अधिकची मते आहेत. त्यामुळे दुसरा उमेदवार देण्याचा आमचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी दिली. दरम्यान, मविआने दुसरा उमेदवार दिल्यास आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरविण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील या निवडणुकीसाठी 42 मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे स्वतःची 44 मते आहेत. याशिवाय, समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट आमदाराचे मतही आमच्या सोबत आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे आमदारांची मोठी संख्या आहे.
काँग्रेसकडे एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मते आहेत. तरीही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही राज्यसभेची निवडणूक लढविणार आहोत. मात्र, काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार नक्की केला नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.