नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने ( बाह्ययंत्रणेकडून) भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुरक्षा व्यवस्था हाताळणाऱ्या मुंबई पोलीस दलात ३ हजार सुरक्षा रक्षकांची भरती (Mumbai Police Recruitment) केली जाणार असून हे सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेतले जाणार आहेत. त्यांच्या एका वर्षात १०० कोटी २१ लाख ४५ हजार ५८० रुपये सुरक्षा शुल्क लागणार असून तीन महिन्यांसाठी येणाऱ्या ३० कोटी रुपये खर्चाला बुधवारी गृहविभागाने मंजूरी दिली. यामुळे दिवाळीनंतर या कंत्राटी भरली प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात राज्य सरकारने कंत्राटी म्हणजे ( बाह्ययंत्रणेकडून) (Mumbai Police Recruitment) कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन घेण्यास परवानगी दिली. यामुळे आता सरकारी कार्यालयांची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे एकप्रकारे सोपवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या मुंबई पोलीस दलात ३ हजार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळाकडून हे सुरक्षा रक्षक पुरवले जाणार आहेत. ११ महिन्यांच्या करारवर हे कर्मचारी घेतले जाणार आहेत. ही सेवा घेण्यासाठी सुरक्षा रक्षक महामंडळाला दर महिन्याला ८ कोटी ३५ लाख १२ हजार १४० रुपये एवढा सुरक्षा शुल्क द्यावा लागणार आहे. एका वर्षासाठी १०० कोटी २१ लाख ४५ हजार ५८० रुपये खर्च येणार आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी या सुरक्षा रक्षकांसाठी २९ कोटी ५८ लाख ९६ हजार ४० रुपये खर्च होऊ घातला आहे. त्यामध्ये २१ कोटी २३ लाख १९ हजार रुपये एवढा निधी महामंडळाकडे जमा करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना बुधवारी गृह विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली.
या निर्णयामुळे दिवाळीनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police Recruitment) दलासाठी नव्याने ३ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया महामंडळाकडून होण्याची शक्यता आहे. एका महिन्यांत ही भरती प्रक्रिया पुर्ण करुन हे सुरक्षा रक्षक मुंबई पोलिसांच्या बरोबर मुंबईच्या सुरक्षेसाठी रूजू होतील. या सुरक्षा रक्षकांवर पोलीस शिपाई पोलीस दलात जी जबाबदारी सांभाळता ती सोपवली जाणार आहे. यामुळे पोलीसांवरील बंदोबस्त, राजकीय सभा, मोर्चा, आंदोलने आणि वाहतूक हाताळण्यासाठी या नवीन ३ हजार मनुष्यबळाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.