पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Shami : वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा जरी पराभव झाला असला तरी संघातील खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. टीम इंडियाने फायनल वगळता संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि सलग 10 सामने जिंकले. आयसीसीने निवडलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघातही भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला. 11 पैकी सहा खेळाडू टीम इंडियाचे आहेत. विराट कोहलीने 11 डावात 765 धावा केल्या. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर, मोहम्मद शमीने सात सामन्यांत 24 बळी घेतले. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर त्याला संधी मिळाली आणि त्याने अशा विकेट्स घेतल्या ज्याने सर्वांनाच थक्क केले. ज्यामुळे शमीच्या यशावर देशवासीय नाचताना दिसले. त्याचवेळी पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. पण आपल्या टीकेला शमीने खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर निशाणा साधत शमीने, 'पाकचे खेळाडू माझे त्यांचे यश पचवू शकले नाहीत,' असा टोला हाणला आहे.
शमीला (Mohammed Shami) सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली आणि संघात पहिल्यांदा बदल झाला. शार्दुलच्या जागी शमी तर हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी मिळाली.
शमीने (Mohammed Shami) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. पुढे तो इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघासाठीही धोकादायक ठरला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने बेताल वक्तव्य केले. तो म्हणाला की, 'आयसीसी कदाचित भारतीय वेगवान गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देत आहे आणि त्यामुळेच ते भेदक मारा करू शकले.' रझाच्या टीकेचा शमीने समाचार घेतला आणि त्याने षड्यंत्र सिद्धांतावर टीका करणारी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. आता विश्वचषक संपल्यानंतर शमीने एका पॉडकास्टमध्ये हसन रझासह इतर पाकिस्तानी खेळाडूंवर टीका केली ज्यांनी टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले होते.
शमी म्हणाला, 'मला माहित आहे की सत्य बोलताना मी कडवट होऊ शकतो. पण एवढे करूनही मी तोंड उघडले नाही तर ते योग्य होणार नाही. मी कुणाशीही ईर्ष्या करत नाही. जर तुम्ही इतरांच्या यशाचा आनंद घेण्यास सुरुवात केली तर तुम्ही चांगले खेळाडू बनू शकता. विश्वचषकाच्या सुरुवातीला मी खेळत नव्हतो. तो खेळत असताना त्याने पाच, चार किंवा पाच विकेट घेतल्या. काही पाकिस्तानी खेळाडूंना हे पचवता येत नाही, मग मी काय करू?'
शमी (Mohammed Shami) पुढे म्हणाला, 'पाक खेळाडूंना आपलाच संघ उत्कृष्ट आहे असे वाटते. पण मला त्यांना सांगायचे आहे की, योग्य कामगिरी करणाराच श्रेष्ठ ठरतो. पा हे पाकिस्तानी खेळाडू उगाचच चेंडूवरून विनाकारण वाद निर्माण करत आहेत. खरेतर त्यांनी स्वतःला सुधारले पाहिजे.